Monday, 9 May 2016

मर्म बंधातली ठेव हि --आजोळ 
आज सकाळी देवांची पूजा करीत होतो .एकीकडे तोंडाने हिरण्यवर्णा हरिणीं चालू होत .एवढ्यात बेल वाजली आणि पटकन तोंडून सणसणीत शिवी गेली ,या xxxx ना हीच वेळ बरी सापडते .बायको माझ्याकडे पहात सहज म्हणाली अहो श्रीसूक्त म्हणताय कि शिविमहीम्न स्तोत्र ? मी चमकून पाहिलं ,हाच प्रसंग अगदी असाच साधारण ४५ वर्षापूर्वी माझ्या आजोळी घडला होता .आजोबा पूजा करीत होते ,एकतर आजोळी देवघर म्हणजे लोकसभा होती .शे शंभर मंडळी तरी नक्कीच होती .आजोबा पूजा करायला बसत आणि आजी सहाणेवर गंध उगाळायला.केवढी मोठी सहाण आणि खोड होत .अजूनही सहाण
आहे.हल्ली त्या सहाणे एवढ्या जागेत मुंबईत भय्ये रहात असतील .एकीकडे रुद्र चालू असायचा आणि मधून मधून रामकु शेण नीट ओढून घे .नामोविरुपेभ्योविश्वरूपेभ्यश्चवो नमो ,त्या xxxxx सांग ,काल काळीचा मागचा अचूळ नीट पिळला नव्हतास अरे अशाने गाठी होवून गाय मरेल ना.नमोभवायचंरुद्रायचंनमः पोफळ वरच्या अंगणात पसरा रे .हे अस चालू असायचं आणि मग आजीही तेवढीच खट,हळूच चालू करायची ,"अनंत वाचाळ बरळती बरळ,त्या कैचा दयाळ पावे हरी ".
काय सुरेख जोडी होती हो .आजोबा एक खट तर आजी महाखट पण त्या काळात या जोड्या अशाच होत्या .आज्या पुस्तकी कमी शिकलेल्या होत्या पण जिभेवर कायम नाना फडणवीस .
आजोबांची पूजा झाली कि आजी हळदीकुंकू वाहायला बसायची,अशावेळी आजोबाना चुकून कुणी विचारल कि आजी कुठे आहे म्हणून तर आजोबांचं उत्तर ठरलेल "त्यांच्या देवांशी मुलाखती चालू असतील ,देवांना त्यांची काम वाटून देणे चालू असेल ."आणि खरोखर आजी देवांशी गप्पा मारीत पूजा करीत असायची ."ए लंगडोबा,कधी मोठा होणार आहेस कि कायम आपला बाळकृष्ण ?".गणपती बाप्पा अरे तुला बोलता नाही का येत पुजाऱ्याला ?मुद्दाम आजोबाना ऐकू जाईल असे ..अरे म्हणावे एवढे गंध लावू नका ,सर्दी होईल आम्हाला .ओ लक्षुमबाई केवढा हा मळवट ? पिंजरेच टेंगुळ आलय ग बाई.तू तर काय बाबा नर्मदेतला गोटाच.
मधेच आजोबाना सूचना असायची "बाजारात जाताय तेव्हा येताना चहाची पूड घेऊन या ,संध्याकाळच्या चहाला कुणी बाच्छाव [बादशहा ] पुडीचा नजराणा पाठवणार नाहीये .मध्येच सुनबाईला देवा मार्फत संदेश असायचा .प्रत्येक सून लग्न करून येताना माहेरची देवी घेऊन आलेली असायची ,मग ए आसूदकरणी तुझ्या माहेरवाशिणीला चुलीवर चहाच आधण ठेवा म्हणाव .ए देवरुख्ये [देवरुखच्या मामीची देवी ]तुझ्या साळकाईला सांग ,चुलीकडे लक्ष ठेवा काल वैलावर दुध उतू गेल होत .अस मस्त चाललेलं असायचं .
कधी कधी वाटत साला त्यावेळी रेकोर्डिंग ची सोय असती तर या दोघांचे संवाद टेप करून ठेवले असते .
देव आणि देव्याच नव्हे तर या नामकरणातून झाड झुडप हि सुटायची नाहीत .घराचे भाग सुटायचे नाहीत .
एक पडवी होती तिथे एक अप्पा कासार म्हणून बांगडी विकणारे राहायचे म्हणून ती कासार पडवी होती .एक वैद्य म्हणून विद्यार्थी होते ,घरातील एक माडी कायम वैद्याची माडी झाली ,नानाची विहीर होती ,एका चिऱ्याच्या गाडग्यातून दोन तीन वेळा साप निघाले म्हणून तो चावरा गडगा झाला .
देवाला आज फुल आणली नाहीत का ?अरे ,कुणीतरी त्या सत्यभामेला जरा हलवा रे .नवीन मंडळी बघतच रहायची पण घरातील मंडळी शांत ,एकजण उठायचा आणि परडी भरून १० मिनिटात पारिजातकाची फुल घेऊन यायचा .हि आमच्या आजीने केलेली झाडांची बारशी.काही नाव वंशपरंपरेतून आली होती काही आजीने ठेवलेली आणि या प्रत्येक नामकरणापाठी काहीतरी इतिहास होता .
तशी झाड सगळ्यांनाच आवडतात पण त्याना ही काही खोडकर ,कौतुकाची नाव ठेवण्याची सवय फार थोडे ठिकाणी .पुण्यात जसे मारुती आहेत आणि त्यांना विचित्र नाव हि आहेत तशी कोकणात कुत्रा ,बैल ,गाईच नव्हेत तर झाडानाही गोड नाव दिलेली असतात ,तशी सगळीकडेच हि पद्धत आहे पण एक बारीक फळ देणाऱ्या आंब्याला रोंग्या हि कोकणी खासियत .
आज हुप्याचे फणस उतरवायचे आहेत हे म्हटले कि बाळ्याला नेमके कळायचे कि आज आपल्या बागेतील एकदम शेवटच्या फणस उतरवायचा आहे .बागेच्या चार कोपर्यात चार पिंपळ होते त्यांना कुबेर ,अनल ,यम आणि अगस्ती [समुद्राच्या बाजूला होता ]अशीच नावे होती .
सदफुलीला आनंदी नाव होत .अनंताच्या झाडाला आजोबा कृष्णा म्हणायचे ,एकतर अनंत म्हणजे कृष्ण आणि आजोबांचे एक कृष्णाचे काम करणारे कृष्णा गोरे म्हणून आवडते नट होते ,आम्ही अनंताची फुल कधीच काढली नाहीत ,कृष्णाला खुडला .
एक पपनशीच झाड आहे ,अजूनही आमच्याही तोंडी "बयोला केवढी फळ आली आहेत ".असच येत ,कुणीतरी एक बयो जरा स्थूल होती झाल ती पपनस बयो झाली .एका आंब्यावर नेहमी कोकीळ ओरडायचा तो नारायणराव झाला होता हे ठीक पण एक कोकंबी इरावती का होती देव जाणे.
रोंग्या ,थोट्या ,मोहंबा ,साखरबीटकी होती हे ठीक पण एक वेडxx आंबा का आहे हे विचारल्यावर अरे फळ येत तेव्हा भरमसाठ नाहीतर फक्त तोरणाला पानासाठी उपयोग हे उत्तर मिळाल .
पोट्या,झुक्या ,हुप्या हि फणसाला नाव .काळ्या तुळशीला काळूबाई आणि इतर तुळशीला नावडती हे आजीने केलेलं नामकरण .
सर्व पत्री १५ ते २० मिनिटात काढून आणण्यासारखी होती पण आजोबा कधी पत्री गोळा करा म्हणाले नाहीत ,त्याला आजीबाईचा बटवा गोळा करा रे म्हणायचे .
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे आणखीन वेगळ काय होत ?

2 comments: