Monday, 9 May 2016

एकदा तरी गम्मत अनुभवावी----
तुम्ही जत्रा अनुभवली आहे ? गावचा आठवडा बाजार ?रेल्वेठेसन किवा एसटी स्थानका वरील गावी जाणाऱ्यांची गर्दी ?शेवटचे आचके देणाऱ्या माणसाच्या नातेवाईकांची हॉस्पिटल मधील गर्दी?गावच्या भैरुबाच्या जत्रेत निशाण नाचवीत.गुलाल उधळीत,ढोल वाजवीतभैरुबाच्या नावान चांगभल करीत येणाऱ्या पालख्या ? काहीच नाही मग तुम्ही फार मस्त अनुभव मिस केला आहे.आणि हे सर्व एकत्र पहायचं असेल तर एक ठिकाण आहे फक्त पारिटघडी मोडून बेभानपणे त्यात सामील होता आल पाहिजे.
काही दिवसापूर्वी माझ्या कुंडलीत हा दैवी योग आला आणि परवा बांद्रा निवडणूक निकाल पाहताना त्याची आठवण झाली ,खरोखर अजि म्या ब्रह्म पहिले.
निवडणुकीनंतर मतमोजणी होते तो हा परिसर.एकदा सामील व्हा आणि मस्त अनुभव घ्या.
तो परिसर पोलिसांच्या ताब्यात असल्याने १४४ कलम लावल्या सारखा आधी थोडा संघ दक्ष या पोज मध्ये असतो.जड आवाजाचे आणि चेहऱ्याचे पोलीस त्या दिवशी कदाचित ऑप्शनल रजेवर असावेत.
शांतपणे सगळ्यांना बाजूला व्हा अस मानेने व हाताने सांगणारे पोलीसदादा म्या माझ्याडोळ्यांनी पहिले.उद्या यातून निवडून आलेला कोणी गुंड आपला साहेब होईल आणि आपली गडचिरोलीला बदली करेल हि भीती असावी.
निवडणूक अधिकारी व त्या दिवशी तिथे नेमलेला कर्मचारी वर्ग हे त्यादिवशी तिथले सम्राट.या मंडळींच्या चेहऱ्यावर आपण भारताची घटना लिहीत असल्याचा भाव,चेहरे डेथ सर्फटीकिट देणाऱ्या डॉक्टर सारखे निर्जीव.एकतर बिचारे या कामाला जुंपलेले असतात,घाण्याचा बैल गाण म्हणत घाण!
चालवेल हि अपेक्षाहि चूकच.
हळूहळू एकेक उमेदवारत्यांच्या खाशा ३/४ सरदारा बरोबर येऊ लागतात.हे नेहमी अलिशान गाडीनेच येतात.नवरी बरोबर तिचा घाम/शेंबुड टिपायला,तिचे न विस्कटलेले केस सारखे करणाऱ्या करवल्या असतात तसे हे ३/४ जण असतात.त्यातला एक गाडीचा दरवाजा उघडतो,दुसरा सतत मोबाईलवर सूचना देतअसतो,तिसऱ्याच्या हातात कसलीतरी फाईल असते.गाडीवरील पक्षाचा झेंडा बहुदा त्या काठीलाच गुंडाळला गेलेला असतो.मग डायवरच्या बाजूला बसलेला कार्यकर्ता हात बाहेर काढून तो सारखा करण्याचा प्रयत्न करतो.मग उमेदवार गाडीतून उतरतो,पांढरे शुभ्र कपडे एका हातात मोबाईल कपाळावर गुलालाची आखीव रेघ,तो जाताजाता उगीच बाय केल्यासारखा हात हलवतो.तिथल्या इन्स्पेक्टरला काहीतरी सूचना देतो,कोणी म्हातारा दिसलाच तर त्याच्या गुढग्याला हात लावून नमस्कार करतो.ह्या सगळ्या कृती तो बिजवर आहे हे सिद्ध करतात.बोकड नवीन असेल तर एक कृत्रिम हास्य चेहऱ्यावर असत.
हे सर्व उमेदवार त्यांच्या पिलावळी बरोबर आत गेले कि चित्रपट सुरु झाला कि तिथली मुतारी जशी ओस पडते तसा काही काळ तो एरिया ओस पडतो.खरी धमाल चालू होते थोड्या वेळाने.
हळूहळू एकेका उमेदवाराच्या दिंड्या येऊ लागतात.विजयअसो,विजय असो,हम तुम्हारे साथ है,एक अंगार है बाकीसब भंगार है अशा आपल्या उभ्या राहिलेल्या विठोबाच्या नावान घोषणा चालू होतात.
इतका वेळ शिस्तीत चालणारे वारकरी इटूरायाच्या देवळाचा कळस दिसला कि धावत सुटतात तसे हे भक्त पोलीस अडवतील तिथपर्यंत धावत का सुटतात ते एक राष्ट्रपतीच जाणोत.मग पोलीस त्यांना नम्रपणे हाकलतात आणि थोडे लांब हे जत्थे स्थिर होऊ लागतात.
मग एकमेकाला कडकडून भेटणे,अंगठे दाखवणे,व्ही फॉर विक्टरी दाखवणे,मतदानाला लोकांना बाहेर कसे खेचले या थोड्या फुगवून सांगितलेल्या कथा चालू होतात.
या लोकात कोणी उमेदवाराचा नातेवाईक असेल तर त्याला शंकराच्या देवळातील नंदीचे महत्वयेते.
एवढ्यात त्या पक्षाचे कोणी थोर,आदरणीय वगैरे नेते गाडीतून येतात व कायरे सगळे आलेना अशी जातीने चौकशी करतात,मग त्यांच्या समोर घोषणांना उत् येतो,जवळच विरोधो पक्षाचे लोक असतील तर हि जुगलबंदी फारच धमाल असते म्हणजे ऋग्वेदी आणि आपस्तंबी सामोरा समोर देवे म्हणतात तसा फील येतो.त्या मध्ये एक दणका आवाज असलेली कार्यकर्ती किंचाळल्यागत घोषणा देत सुटते,मगते पुढारी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवतात.तिच्या ओघळलेल कुंकू व एकंदर अवतारावरून ती भीमरूपी महारुद्राची आई अंजनी असावी असा भासहोतो.मग श्रेष्ठींनी आणलेले वडापावच वाटप होत.
थोडावेळ एकदम स्मशानशांतता पसरते,काही न्यूज अशा विचारणा चालू होतात.मग कोणीतरी चहाची टूम काढतो आणि अन्त्याविधीचे धार्मिक कार्यक्रम चालू असताना काही लोक चहा प्यायला सटकतात तसे काहीजण पांगतात यावेळी बिल देण्याची अहमहमिका लागते प्रत्येक जण अंबानी असल्यासारख्या मोठ्या नोटा बाहेर काढतो.
मग पाण्याची शोधाशोध चालू होते,त्यातलाच एक भगीरथ बिसलेरीची गंगा घेऊन येतो.त्यात सुद्धा पहिली बाटली एखाद्या सुंदर खाशी सुबक ठेगणिला दिली जाते,एक जवळील पुलीसदादाला.तेवढ्यात बुलेटीन येते दोन राउंड झाले साहेब ६००ने पुढे.कायझाल ? प्रत्येक जण मान उंचावून विचारतो.किती
राउंड झाले हा दुसरा प्रश्न.
आपला उमेदवार पाठी असेल तर डेफिसिट चार राउंड मध्ये उतरेल व पुढे असेल तर आता काय तो लीड भरून काढत नाय अशी कुजबुज.त्यातले २/३ टग्ये बंडखोर व प्रतिस्पर्ध्याला यथेच्छ शिव्या घालत शिमगा हि करतात.एकजण उद्या संख्याबळाची जुळवाजुळव आपल्यालाच करायची आहे असा आव आणून सगळिकडील आढावा मोबाईलवर घेत असतो.जसजसे राउंडचेआकडे 
बाहेर येऊ लागतात तसतस ब्लड प्रेशर कमी जास्त होतजात.आवाज बुलंद किवा घोगरे होत जातात.
हावभाव बॉडीलँग्वेज,उत्साह बदलत जातो.पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते उदास चेहऱ्याने पांगायला लागतात आणि उमेदवार जिंकला कि आकाशाला भेदून जातीलअशा घोषणा,नाशिकढोल सगळे अवयव हलवून तांडव नृत्य,हार,पेढे अशी धमाल करत हे विजयी वीर आपापल्या एरियात निघून जातात.गडगडून पाऊस पडून गेल्यावर आकाश जस निरभ्र होत तशी ती इमारत होते व नाविनवारी
हनिमून करून आल्यावर २/४ दिवसात पोळीची कणिक मळू लागते तशी ती इमारत नेहमीच्या कामाला लागते.

No comments:

Post a Comment