Monday, 9 May 2016

बन्याबापू --लक्ष्मीनारायणाच्या देवळात रामनवमीच्या उत्सवाचे लळीताचे ‘एकच प्याला’ नाटक, आर्य मदिरा मंडळाचा प्रवेश सुरु होता. एवढ्यात प्रेक्षकांमध्ये कुजबूज, “काय झालं? “काय झालं? सगळीकडे गलका ! त्या प्रवेशात रंगलेल्या बन्याकाकांच्या घरी भाताच्या उडविला आग लागली होती. त्या काळी कोकणात एखाद्याच्या घरी भाताच्या उडविला आग लागणे म्हणचे केवढे संकट होते हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. पण घरात १०/१२ खाणारी तोंड ,वडिलोपार्जित फक्त बुद्धीची इस्टेट लाभलेल्या ,सरस्वतीचे वरदान असूनही लक्ष्मीने सावत्रपणाची वागणूक दिलेल्या, फक्त नमस्काराचे धनी असलेल्या भिक्शुकाला हा मोठाच तडाखा होता. एखादा कोलमडून पडला असता, पण इथेच आमच्या दादाचं वेगळेपण होत. नाटक व्यवस्थित पार पडलं. इतरांच्या छातीचे ठोके वाढले पण दादांच्या नाडीचे ठोके अजिबात वाढले नाहीत.
आमचे दादा हे खरोखरच एक वेगळंच रसायन होत. ३० इंची निधडी छाती ! आयुष्यभर अनेक घरगुती,सामाजिक ओझी वाहणऱ्या देहाने वजनकाट्यावर ४० किलोचा आकडा कधीही ओलांडला नाही. प्रसादाच्या मुदीएवढया तपकीरीत डोक्याला टिळ! लावतात तेवढा बुक्का मिसळल्यावर जसा रंग तयार होईल तसा वर्ण ,प्रचंड ताकद असलेले भेदक डोळे ,देशस्थी वर्णात मेंदू मात्र कोकणस्थी आणी सर्वात मुख्य आणी धारदार अस्त्र म्हणजे जीभ
ते आमचे दादा ,जवळच्या नातेवाईकांचे आणी ओळखीच्या मंडळींचे बन्याकाका आणी पंचक्रोशीत इतरांचे बन्याभाव होते .त्यांचे पाळण्यातील व कागदोपत्री नाव गोविंद काशिनाथ होते हे त्याचं त्यांना आठवत होत कि नाही देव जाणे .
वास्तविक माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे त्यांच्या चाळीशीत त्यांचा एक लाख विडी ओढण्याचा संकल्प पुरा झाला असावा ,त्यांनी आयुष्यात श्वास कमी घेतला असेल विडीचे झुरके जास्त ,भोसले छाप विडी ,त्यात पहिला झुरका विडीची जळती बाजू तोंडात धरून मारलेला ,या अग्निहोत्रात कधीही खंड पडला नाही .निद्रानाशा मुळे रात्रीही हे विडीच अग्निकुंड अखंड धगधगत असायचं .एवढे असूनही मी त्यांना कधीही खोकताना पहिले नाही ,छातीत कफ नाही .चर्चिल ने ओढलेल्या चीरुट ची थोटक व दादानी ओढलेल्या विडयाची थोटक यांची माळ केली असती तर इथून ती सहज इंग्लंड पर्यंत गेली असती . पाहिलं व्यसन विडी आणी दुसर चहा ,तो लागायचा किती तर त्यांच्या भाषेत म्हणजे एक तोळा.त्यांना अनेक वर्ष अल्सरचा त्रास होता त्यामुळे जेवणही कमी ..एव्ह्ढ सार असूनही त्यांच्याकडे एनर्जीचा कुठला झरा होता भगवान जाणे .रात्रभर निद्रानाशामुळे जागे असूनही सकाळी टवटवीत १८/१८ तस काम करायचे ,कोणी विचारले ‘बन्या काका ,तब्येत कशी आहे “?कि म्हणायचे “कुंडलीत अन्नद्वेष ,निद्रानाश आणी कामातीरेक योग आहे .”
दशग्रंथी बापाचा हा मुलगा .पण याचे दशग्रंथ वेगळेच होते .याज्ञिकी,काव्य ,चित्रकला, गायन,वक्तृत्व,व्यापार ,समाजकार्य ,अभिनय या अष्टग्रंथांना थोडासा अहंपणा व सडेतोडपणा या दोन ग्रंथांचाही टीळा लागला होता .तरुणपणी मुंबईमध्ये भिक्षुकीला आलेल्या या पठ्याने एका इंग्लंड मध्ये स्थायिक होऊन मडमेशी लग्न केलेल्या दादर येथील यजमानाकडे तीला  कळावी म्हणून कथा ओर्गंनचा सूर लावून संस्कृत आणी इंग्लिश मधून म्हणजे “वन शौनक नेम्ड रिशी
वॉज स्टेइंग इन ए जंगल नेम्ड नैमिष”अशी सांगितली होती  .पुढे त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार चिपळूणला गेले आणी मग आयुष्याच समर सुरु झालं .वयाच्या तिशीत आई ,वडीलांच छत्र हरपलं आणी मग मोठ्या कुटुंबाची जबाबदारी या हडकुळ्या खांद्यावर येऊन पडली .नाना प्रकारचे उद्योग झाले टुरिंग टोकीज ,भाजीचा व्यवसाय,दुग्ध व्यवसाय,बरेचसे आतबट्याचे ठरले ,शेवटी १९५०/५१ मध्ये आपल्या वृत्तीला साजेस लग्न –मुंजीच कार्यालय सुरु केली.त्यातही व्यवसायापेक्षा गरिबांची सोय हाच प्रमुख हेतू होता.’मंगल कार्यालय ,नव्या बहिरीचे देवळाजवळ “हि पाटी आज ६० वर्षांनीही ,आधाराला दोन मजली आर .सी .सी .कन्स्ट्रक्शनची दणदणीत इमारत घेऊन उभी आहे .त्यांचा मुलगा हा वसा उत्तम रित्या पुढे चालवतोय.
भिक्षुकी या धंद्याला जी एक मिंधेपणाची ,लुब्रेपणाची काळी झाक होती टी दादांकडे कधीही दिसली नाही.मंत्र जेव्हढे आवश्यक तेवढे येत होते पण तंत्र आणी प्रदर्शन अफाट होत.वास्तुशांत म्हणा,नवचंडी ,शतचंडी म्हणा ते यज्ञकुंड व इतर पुजासाहीत्याची जी मांडामांड करायचे ती बघून यजमान व आवाहित देवता खुश होऊन जायच्या.
मला आठवतंय आमच्या गावातील एक मुलगी लग्नात सप्तपदीचा अर्थ सांगायला बन्याकाकाच हवेत असा हट्ट धरून बसली होती.”एकपदी भव मामानुव्रतावः”,आणी मग रसवंती सुरु व्हायची.दुर्दैवाने त्या काळी रेकोर्ड करायची साधन गावात उपलब्ध नव्हती .
लोकसंग्रह अफाट होता,धर्म,जात ,दर्जा,आर्थिक परिस्थिती कसलाही कुंपण नव्हत.
बन्याभाव पाडशी इकलीव?असे विचारात खानदाटपालीचे गोपाळराव महाडिक यायचे ,मध विकायला आलेले भोरपी असायचे शिरुकाका ,रामभाऊ बापटासारखी डॉक्टर ,शिक्षक मंडळी,बाबुशेठ मारवाडी,ब्रीज खेळण्यासाठी कलेक्टर, त्यांच्या त्याकाळात असलेल्या स्लीवलेस म्याडम,कधी नाट्यमंदार वाले राजाराम शिंदे ,कधी काशिनाथ घाणेकर असायचे मग जो गप्पांचा फड रंगायचा तो नुसता ऐकत राहण्यासारखा असायचा. ज्यांना बहिणी नाहीत अथवा दूर गेलेल्या आहेत अशा शे शंभर माणसांची बासुंदी-पुरीची पंगत भाऊबीजेला आमच्या अंगणात असायची.
त्या काळात कोकणातील त्या वयाचे बरेचसे गणपती सर्वसाधारण याच छापाचे होते. फरक फक्त एवढ!च की बरेचसे उजव्या सोंडचे व काही डाव्या सोंडचे.पण काही ठराविक गोष्टी सोडल्या तर दादा डाव्या सोंडचे ठरले असते. आजी,आजोबांची होणारी वार्षिक श्राध्दपक्ष, कुळपरंपरेने चालत आलेली वामनद्वादशी पूजा,(त्या दिवशी व्दादशी श्रवणनक्षत्रयुक्त असलीच पाहीजे हा कटाक्ष)  गणपतीत होणारा मंत्रजागर, नवरात्रीचे उपवास, टिळक पंचांगाचा वापर या काही ठराविक गोष्टी वगळता आमचं घर म्हंणजे एक धर्मशाळा होती आव-जाव घर तुम्हारा.
दादांची दरवर्षी न चुकता दोन वेळा पत्र यायची. आजी आणि आजोबांची श्राद्ध!ची तारीख कळवण्यासाठी व त्यात लिहिलेले असायचं, दुपारी बरोबर १२.०० वाजता आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करावा.’पिंडान नमस् कुर्यात’ची वेळ बरोबर १२.०० वाजता येईल.
खाली टाटा फिनलेच धोतर,वर सदरा, त्यावर निळा कोट, वर मानेला गुंडाळलेलं उपरण, कपाळावर कुंकवाची चिरी, डोक्यात काळी पण डोक्यावर गांधी टोपी, पायात मिळतील त्या वहाण! (चपलेच्या आकारची अट नव्हती) हा वेष, भिक्षुकीला जातांना सदरा,कोट,टोपी, यांना रजा असायची.चातुर्मासात देवळात कीर्तन करायला जायचे तेव्हा पगडी, कानात कायम कनोजी अत्तराचा बोळा आणि हे अत्तर चिमटीवर चोळून वास घ्यायची सवय. अंगठी हा अत्यत आवडता दागिना, त्यांच्याकडे पाहून अंगठी बोटात घालतात आणि जानव्याला ब्राह्गाठीसारखी बांधतात अशी माझी अनेक वर्ष समजूत होती. कोणी काही झकास काम केलं किंवा कोणी उत्तम विनोद केला की ‘पोऱ्या, अप्रतिम !’ असं कौतुक व ‘तुला एक चहा’ हे बक्षीस असायचं आणि हे काम वरच्या पातळीच असंल तर बोटातील अंगठी सगळ्याच्या देखात काढून देण ही सवय होती.घरात कोलंब्या तांदुळाचा भात घरच साजूक तूप व चहाला निरस दुध यात तडजोड चालत नसे ,आम्ही मुंबईकर किवा पुणेकर खातो ते कदान्न ही त्यांची समजूत आम्ही शेवट पर्यंत बदलू शकलो नाही .अनेक विद्यार्थी त्या काळी आमच्याकडे शिकून गेले,एक मोहिते नावाचा आंबेडकरी मुलगाही राहायला होता ,पण सगळे जेवायला एकच पंक्तीत.स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकडे फारस लक्ष नव्हत.कुठ्ल मुल कितव्या यत्तेत आहे याचाही पत्ता नसायचा.काही काम असल की आशे,वाशे,कुम्ये ,सुम्ये ,उषा ,मिन्ये ,कल्पन अशी बा अदब बा मुलाहिजा सारखी आरोळी ठोकायचे व जी हजार असेल तिने ओ दयायची हा दंडक होता.
नाटयदिग्दर्शन व अभिनय हे एक वेड  होते.उत्तम विनोदी भूमिका करीत ,साष्टांग नमस्कार नाटकात त्यांच्या सुटा-बुटातील एन्ट्रीलाच कडकडून टाळी मिळाली होती .आयत्या वेळी एकच प्यालातील रामलाल व देवमाणूस मधील दादाची भूमिका त्यांनी उत्तम केली होती .अट फक्त एकच प्रोम्पटिंगवाला उत्तम हवा.त्यांनी विद्याहरण नाटकात देवयानीही केली होती.
हिंदू महासभेने निजामाच्या हैद्राबादमधील अत्याचारा  विरुद्ध भागानगर येथे सत्याग्रह केला होता त्यात भाग घेऊन तुरुंगवासाची हवाही खाउन झाली होती ,तुरुंगात यांचे वजन दोन किलो वाढल्याचीही वदंता होती.
उत्तम शीघ्र कवी होते,एका लग्नात वरपक्षाकडील खूप मंडळी पाहून पटकन म्हणाले “हे वऱ्हाड नोहे ,मुलीच्या बापाचे वर हाड आले “.चित्रकलेच उत्तम अंग होत.सत्यनारायणाची कथा व सहस्रनाम पाठ असल्या मुळे तोंडाने विश्वस्मैनमः,विष्णवेनमः,वषटकरायनमः चालू असायचं आणि समोरच्या पाटावर रांगोळीने हत्ती किवा मोर साकारत असायचा.कथा होईपर्यंत हळद ,कुंकू ,बुक्का या उपलब्ध रंगाने तो रंगून एवढा सुंदर तयार व्हायचा की आरतीच्या वेळी हत्ती सोंड हलवायला लागेल अस वाटायचं.
राजकारण ,समाजकारण हे लाडके विषय ,चिपळूणला पूर हे नेहमीचाच ,पाऊस जोरात सुरु झाला की एकेक बुलेटीन निघायची ,पाणी भोगाळयावर आल,चिंचनाका ,वेशीचा मारुती ,लायब्ररी असे हे टप्पे असायचे ,अशा वेळी सर्वाना थोडे उंच जोत असलेल्या घरात पाठविणे ,गुरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात दादा गर्क असायचे.१९६५ साली आलेल्या भूकंपात पाहते भूकंप भूकंप म्हणून ओरडत उठलेल्या गावकरांमध्ये कोयना धरणाचे काय झालं असेल हा विचार करून तिकडे धावणारा पहिला इसम गोविंद काशिनाथ उर्फ बन्याबापू चितळे होता .नगरपालिकेत निवडून गेले पण स्पष्टवक्ते पणामुळे यांची जागा कायम मायनोरीटीत.अफाट वक्तृत्व होत .बोलताना जिभेवर पु.ल.म्हणतात तसा सरस्वतीने मराठीचा क्लास उघडलेला असायचा किवा फाडफाड बोलताना सरस्वती महिषासुरमर्दिनी बनून कथकली करायची .सभा संपल्यावर पूर्ण वंदेमातरम भैरवी रागात एवढ सुंदर म्हणायचे की ते ऐकून मातृभूमी सुजलाम सुफलाम झाल्यासारखी वाटायची .शास्त्रीय संगीत हा आणखी एक आवडता विषय ,कुणाचेही गंडाबंद शिष्य नव्हते,तालीम नव्हती पण रेडिओवर रागदारी लागली की उत्तम गायक असलेल्या विष्णूला विचारायचे “विष्णू कुठला राग ?”मग विष्णू चाचरत म्हणायचा बापू मालकंस वाटतोय .
लग्नाच्या वेळी दांडेकर गुरुजी किवा बाबा जोशी भसाड्या आवाजात कस्तुरी तिलकं ललाटी लावत असताना मांडवात गडबड असायची पण दादाचं “फुलेंदी नवकांतइंदू वदनं “सुरु झालं की पिनड्रोप सायलेन्स.जेवणाच्या पंक्तीत भैरव रागात “तु सागर करुणेचा”म्हणायला लागले की पानातली जिलबी साजूक तुपात तळल्या सारखी वाटायची. हा माणूस चौघडा उत्तम वाजवायचा,विडी मुळे छातीत दाम नव्हता ,नाहीतर सनई सुद्धा वाजवली असती .पाकशास्त्रात कसोटी दर्जा नव्हे पण रणजी ट्रोपिचे खेळाडू नक्की होते ,फक्त तेलाचा वापर स्वतः अरब असल्यासारखे करायचे.
खरी आवड मिठाच्या उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूची,जेवताना उकिडवे व डावा हात दोन्ही पायांना गळ्यात मिठी मारल्यासारखा ठेवून बसायचे .जेवण अत्यंत कमी,आम्ही चेष्टेने म्हणायचो दादा तुम्हाला जेवणापेक्षा चीत्राहुतीलाच भात जास्त लागतो .
त्यांच्या काही आवडी निवडी मात्र अनाकलनीय होत्या ,बाबुराव अर्नाळकर ,मामा वरेरकर ही लेखक मंडळी आवडीची,मुंबईत आले की दादरला फुटपाथवर रहस्यकथाच्या पुस्तकाची शेकड्यात खरेदी व्हायची.दुसरी आवड म्हणजे वल्लभभाई पटेल स्टेडियमवर होणाऱ्या फ्रीस्टाईल कुस्त्या ,दारासिंग ,किंगकोंग,मायटी मंगोल हा टनात वजन असणारी मंडळी अत्यंत प्रिय.बोस्टन क्राब ,इंडियन डेथलोक हे शब्द काही दिवस केशवायनमः,माधवायनमः च्या ऐवजी जिभेवर असायचे.
काहीकाही तर्कशास्त्र ही अजब होती ,लहान मुलाने कुठलीही गोष्ट नही म्हटली की चीढ!यचे,कुणी त्या पोराची तो लहान आहे अशी बाजू घेतली की म्हणायचे ‘तो लहान आहेना !मग नही म्हणायला कुठल्या कॉलेजात शिकला,ज्याला नही म्हणता येत त्याला हो म्हणता आलच पाहिजे. गोळाभर खाणाऱ्याला तोळाभर अक्कल असलीच पाहिजे.’
गुटगुटीत जाडजुड पोरांची आवड.म्हणायचे, ‘बघ पोराच्या शरीराला कुठेही पोचा नाही.’ या त्रिप्ररान्वित अत्रिगोत्री एकारांत्यांच्या शरिरात वैश्यवृत्तीची लस कोणी टोचली होती देव जाणे. पण व्यापाराची अतिशय आवड. खरेदीसुद्धा करायची घाऊक. टोपल्यामधून आंबे,करवंदासारख्या फुटकळ वस्तू विकणार्‍याना, भारे, वरंडी विकणार्‍या माम्याना आमचं घर म्हणजे वस्तू पूर्ण विकत जायज एक खात्रीचं ठिकाण होत.भाषा सुद्धा टपरीचे किती वगैरे नाही. ‘सरळ टोपलीचे किती ते सांग’ हीच.!
दादांनी विकत घेतलेलं एक१०-१२ फुटी चंदनाच्या झाडाचे खोड अनेक वर्ष आमच्या अंगणात पडलं होत. आम्ही त्यावरुन दादांची चेष्टाही करायचो. उदया जर एका हारयात घालून कुणी ८ /१० टेलिव्हिजन विकायला आणले तर आमच्या घरी ह्याची काय किमत विचारून एकदम ८ /१० टेलिव्हिजनची खरेदी झाली असती.
अहंपणा मात्र जबरदस्त होता ,मी म्हणेन तेच व्हायला पाहिजे हा आग्रह होता.घरी काम करायला आलेल्या टेंगळ्या सुताराला देखील ताकीद असायची ‘टेंगळ्या अक्कल माझी आणि फक्त ठोका तुझा.”
रत्नागिरीला आतेकडे गेले होते,कशावरून तरी तिथल्या गड्याला ओरडले ,आते म्हणाली दादा ओरडू नको ,उदया तो काम सोडून जाईल त्यावर पटकन म्हणाले ‘येशे,पिंडाला शिवायला लागतात म्हणून कोणी कावळे बाळगत नाहीत “.माझी आई आजारी होती तेव्हा त्याचं पत्र आल होत ,लिहिली होती काही रोग हत्तीच्या पावलानी येतात आणि मुंगीच्या पावलानी जातात .
लग्न ठरवायला गेले होते,लग्न मुलीच्याच गावी का व्हाव हे सांगताना पटकन म्हणाले ‘त्याच काय आहे अहो मगर पाण्यात असली की हत्तीला सुद्धा ओढते “
मुलांशी तात्विक मतभेद होते,पटायचं नाही ,त्यांच्या साठीशांतीच्या वेळी कोणीतरी चटकन म्हणाले ‘बन्याकाका आयुष्य मजेत चाललय ना ?,मुलगे कर्तबगार आहेत .”एक सेकंदाचा वेळ न काढता म्हणाले ‘खर आहे ,पोर चाटतात पण बैलांच्या जिभेने [बैलाची जीभ खरखरीत असते ].गाईच्या नव्हे.भांडणात एका मुलग्याची जरा वरची पट्टी लागली तेव्हा पटकन म्हणाले”ओरडू नकोस ,नकाशे फडफडले म्हणून कुठे भूकंप होत नाहीत ‘
एका गुरुवारी एक भिकारी दारात आला,दादांनी त्याला पोटभर जेवायला घातली ,तस तो भिकारी म्हणाला “तुम्ही मला दत्तगुरू सारखे भेटलात ‘त्याला बसवली म्हणाले एक फरक आहे ,गुरूच्या पायाशी काय असत ?तो भिकारी म्हणाला कुत्रा असतो.दादा म्हणाले होय ना ?तो कुत्रा माझ्या तोंडाशी असतो .
या माणसाकडे मंत्र टाकून विंचवाच विष उतरवायची कळ ही होती .एकदा शेजारच्या व्यास सरांच्या पत्नीला विंचू चावला,टी दादांकडे आली ,त्यात कोणीतरी चेष्टा केली ,वाहिनी विंचूच चावलांना ?तशी पटकन म्हणाले ‘अरे गधड्या व्यास चावला असता तर परीघ वाढला असता “व्यास वाहिनी हसून हसून दमल्या .
मी दादांना हवालदिल झालेले फक्त एकदाच पहिले ,काकूला शेवटी कर्करोग झाला ,वेदनेने बिचारी ओरडायची,तेव्हा डॉक्टरांना म्हणाले डॉक्टरटिळ वेदनेतून मुक्त करा,टी गेली तरी चालेल .”विना दैन्येन जीवनम,विनायासेन मरणं’एवढ बोलून अक्षरशः धाय मोकलून रडले.
१९८१ साली दादा वारले.वादळ शांत झालं .६७ वर्ष फुललेली ही विडी विझून गेली.योग्य वातावरण ,संधीच कोंदण मिळाल असत तर खरोखर हा अनमोल हिरा होता.
बाहेर पाऊस सुरु झाला,वारा सुसाट सुटला होता ,मी दादांच्या पार्थिवाकडे पहात होतो ,मला उगीचच वाटल दादा उठतील आणि नेहमीप्रमाणे अस वर सुटल की ओरडायचे तसे ओरडतील ‘पोरानो ,आधी माजघरात चला आणि सर्व मंगल मांगल्येचा जप सुरु करा “.
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये मृत्युलेख छापून आला होता ,त्याच शीर्षक होत .....
गोविंद काशिनाथ उर्फ बन्याकाका.
“बन्याबापू ---हा मातीचा गुण की गुणांची माती “    
    


No comments:

Post a Comment