Monday, 9 May 2016

तुझा भाट मी वर्णितो रामराया
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
महाराज दे अंगीचे वस्त्र आता
बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा !
यातील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर दीर्घ म्हणायचे ,तुझा ,सदा .महाराज मधील महा हि अक्षर ठासून म्हणायची ,स्वर साधारण पंचम किवा षड्जात .नक्की माहित नाही पण शे सव्वाशे वर्ष नक्की झाली .गुढी पाड्व्यापासून दशमी पर्यंत रात्री ०९.३० वाजता लक्ष्मी नारायण देवळात वरील श्लोकाचे सूर याच पद्धतीने म्हटले जात आहेत ,अनेक पिढ्या रामतीर्थावर इतिहास जमा झाल्या पण नवीन पिढी त्याच जोशात ,किंबहुना अधिक चांगला हा आमचा रामनवमीचा उत्सव साजरा करीत आहे .
सगळे गावकरी साधारण ०९.१५ पासून कै.गोविंद बापूंच्या अंगणात तसेच जमा होत आहेत ,काही मुल पार्वती काकुच्या घराच्या पायरीवर बसली आहेत ,एकदा हि सवाई सुरु झाली कि खिशातील टोपी डोक्यावर चेपून देवळात प्रवेश करायचा ,लक्ष्मी नारायणाला नमस्कार ठोकायचा आणि गाभार्याच्या दरवाजा बाहेर दोन बाजूला दोन भाग करून गळ्यात ढोलकी आणि टाळ घेऊन उभे राहायचे ,पूर्वी रामाच्या सन्मुख देवळाच्या वेशीवर हनुमंतराय होते त्यांना आता देवळाच्या नूतनी करणात देवळात जागा मिळाली ,म्हणजे अंजनीपुत्र जागेवरच आहेत ,मंदिराची भिंत बाहेर गेली .आता दहा बारा वर्षाची मुल गळ्यात ढोलकी अडकवून उभी असतात आणि ठेका चुकत नाहीत ,संपूर्ण भजनाला एक ठराविक पद्धतीचा ठेका आहे पण दोन रामनवमीचे आंब्याचे पन्हे प्यायल्याखेरीज ,रामा रामा हो रामा या गजरावर नाचल्या खेरीज हि ढोलकी वाजवायला जमत नाही हे खर .
या भजनाचा एक साचा ठरलेला आहे ,ती गोष्ट त्याच क्रमाने आणि त्याच सुरात होणार ,जरा कुठे गंधाराच्या जागी मध्यम लागला कि जेष्ठ मंडळी डोळे मोठे करणार ,आणि नाही हो ते ऐकायला कानांना खटकतच .
वरील सवाई ने नमन झाले कि धडाधड रामदासी सवाया सुरु .
रामदास....
वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।
जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १
राम राम राम । जन सज्जन विश्राम ।
साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २
अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।
बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३
धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।
सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४
म्हणावा जयजय राम !
धन्य कैलासभुवन । शुभ्र शंकराचे ध्यान ।
पुढे नाचे गजानन । सिंहासनी बैसला । । १
वाचे उच्चारिता हर । त्यासी देतो महावर ।
करी पातकांचा संहार । अंकी गिरिजा शोभली । । २
कृष्णा गोदां भागीरथी । ज्याचे जटेतून निघती ।
पावन त्या त्रिजगती । स्नानपाना लाधल्या । । ३
भैरवादी समुदाय । रामनाम नित्य गाय ।
भवभ्रम सर्व जाय । लक्ष पायी ठेविल्या । । ४
म्हणावा जयजय राम !
रोज सवाई वेगळी .सवाई संपली कि एका सुरात सुरु .
परम सुंदर रूप श्यामल ,इंद्रनील किलकांती कोमल
भायनिवारण भक्त वत्सल ,वर पराक्रम कीर्ती विमल
भुवन कंटक दैत्य मारक,अमर मोचन दैत्य हारक
विकट विशमताल छेदक ,वराह नामक दैत्य भेदक
दश्मुखादिक शिरछेदक,ऋषिमुनिजन चित्त वेधक
अमर भूषण उत्तमोत्तमा,भुवन पालक हा राघोत्तमा
विरविरान्तक हा विरोत्तम ,असुरान्तकहा असुरोत्तम
बहुत पीडक दैत्य भंजन ,ऋषिमुनिजन योगी रंजन
दुरित दानव दुष्ट कंदन ,अतुल कीर्तन व्यस्त व्यंजन
जयजय मार्तंड वंशावतंस,जयजय कैवल्यधाम
जयजय भरताग्रज,जयजय सीतारमण
जयजय सिंहासनाधीश्वर ,जयजय सुरराज विराजित पद
नमस्ते नमस्ते नमस्ते .
हि रचना बहुधा रामदासी असावी ,पण हे नमस्ते नमस्ते कोठून आलय माहित नाही .
हे झाल कि आरती आणि नंतर प्रदक्षिणा .
अच्युतम केशवम ने प्रदक्षिणेला सुरवात ,आणि रामा रामा हो रामा हा गजर ,तो प्रत्येक दिशेच्या कोपर्यात दुगुणी ,चौगुणी वेगात ,तिथे ढोलकीची जुगलबंदी .त्या ढोलकीच्या आवाजात रामारामा हे शब्द विरून जायचे ,नाचायचं ,कि परत मूळ वेगात रामा रामा हो रामा सुरु .
मग देवळात परत अत्माजारामा हि आरती ,रोजच्या वारा प्रमाणे त्या त्या देवाची आरती .
नंतर कोणीतरी एखाद भजन सांगायचं आणि परत भोवरी [नाचत वर्तुळाकार प्रदक्षिणा ]सुरु .यात देखील पदन्यास ठराविक पद्धतीने ,म्हणजे आधी ग्यानबा तुकाराम सारख ,नंतर दीड पायावर जॉगिंग केल्यासारखं ,मग एक पाऊल उजव्या हाताला आधी पाठी आणि मग पुढे असा उडवत नाचायचे आणि भजनाला अगदी विठूचा गजर हरिनामाचा पासून कुठलाही जागर .इथे आणखीन एक नियम प्रत्येक ओळी नंतर "हरिहर " म्हणायचं .इथे नाचताना शरीराचा कस लागायचा.सुरवातीला नाचणारी मंडळी जस वय वाढत जाईल तस पोझिशन बदलायची म्हणजे इतर नाचताना गोलाच्या मध्यभागी राहून हात वर खाली करत डायरेक्शन देणे ,एकाच जागेवर नाचणारे जास्त वेळ नाचत बसले कि पुढे चला म्हणून हाताने सांगणे ,बाजूच्या खिडकीत जाऊन बसणे,एका जागेवर उभ राहून घंटा बडवत राहणे ,देवळातून हळूच बाहेर सटकून गोविंद बापूंच्या अंगणात डोक्यावरील टोपीने वारा घेत बसणे.दोन तास अक्षरशः स्ट्रेस टेस्ट ,बी पी .सगळ चेक व्हायचं .मग खणखणीत आवाजात ऋग्वेदी देवे आणि मग अत्यंत टिपेत "सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा" या श्लोक पासून "कळेना पुढे काय होणार आहे "हे पाच रामदासी श्लोक .
रामाला रोज उसळीचा नैवेद्य ,ती देण्यासाठी रोज अनेक भक्तांचे नंबर लागलेले ,यांना घुगर्या म्हणायचं .देवळात कळेना पुढे चालू झाल कि बाहेरील अंगणात "घुगर्यो"अशी बोंबाबोंब .
अत्ता माझ्या डोळ्यासमोर आहेत ते दीड पावलावर नाचणारे अप्पा वैद्य ,अण्णाकाका ,भार्गावकाका बापट ,धोतराचे ओचे बांधून घुगर्यांचे पातेले घेऊन घुगर्या वाटणारे दत्तूकाका ,अप्पा सोमण ,खाकी भागवत मास्तर [कायम खाकी शर्ट घालायचे ]पायरीवर बसून बोंबाबोंब करतात म्हणून ओरडणारी पार्वती काकू ,शांतपणे सगळ्यांचे स्वागत करणारे ,सगळ्यांना पाणी ,पानसुपारी देणारे ,"निवास ,आलास कधी ? केशव येणार आहे का ?अशी विचारपूस करणारे गोविन्द्बापू .सगळे सगळे निजधामास गेले .
उत्सव सुरु झाला आहे मनात रामारामा हो रामा पिंगा घालायला लागले आहे .
सकाळपासून थोडी अनइझी आहे ती.
अग पण आजच नववा लागला ना ?
हो,पण तुम्ही काही म्हणा.आज सारखी उठबस सुरु आहे.
मानू,पोटात दुखतंय का ?
आई,ती उत्तर का देणार आहे ?
असू दे,मला तिची आणि तिला माझी भाषा कळते.
आई तू चहा प्यायला चल.
मी इथून हलणार नाही,ती दिवसभरल्या सारखी बेचैन आहे.एक काम कर तिला गुळ पाणी घेऊन ये.
तिच्या ओटीपोटावरून हात फिरवत ---अग आजच का मला परत आजी करणार आहेस ? मी आहे हो इथे,काळजी करू नको.
२ तास गेले,३ तास गेले .अहो डॉक्टरना फोन करा.
अग गेल्याच आठवड्यात बघून तपासून गेलेत.
ते मला माहित नाही,तुम्ही फोन करा.
हो करतो ,पण तू वर चल,ती लाजत्ये,आपण सीसीक्यामेरा वरून लक्ष ठेवू.
१५ मिनिट झाली आणि जोरदार हम्मा,एवढ्यात मोलकरीण धावत आली,वाहिनी लवकर या ,पाय बाहेर आलेत.
माझी बहिण,भाची धावत खाली,गाय विताना तिच्या भोवती फेर्या माराव्यात,पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य मिळत.
बहिणीच्या फेर्या सुरु,तोंडाने सर्व मंगल मांगल्ये.
५ मिनिटात गो.नी.दांडेकरांच्या भाषेत,बरक्या गर्यातून अठीळ पूटकन बाहेर पडावी तस एक गोड हरणाच्या पिल्लासारखा कौतुक पृथ्वीवर अवतरल,नीट उठता येत नव्हत.सर्व सोपस्कार पुरे करून बहिणीने त्याला उचलून गाईच्या अचूळाशी नेल आणि इवले ओठ लुचलूच करायला लागल.
धबाबा कोसळे तोय-------राज्यभरात यंदा भरपूर पाऊस ,कोकणात ७० तर मराठवाड्यात ४० % अधिक पाऊस------मला समर्थांचे निसर्गप्रेम आणि विशेषतः त्यांच्या साहित्यात पाण्याबद्दल असलेला त्यांची ओढ,ममत्व,कळवळा,त्या पाण्याच्या आकंठ प्रेमात बुडणे हे दर्शविणाऱ्या काही ओळी आठवल्या. परंतु त्यातही त्यांचा विवेक सुटलेला नाही, रामदास आपल्या निसर्गावरील प्रेमास व्यावहारिक, भौतिक महत्त्वाच्या पातळीवर आणून ठेवतात. त्यामुळे ते अधिक मोठे ठरतात, म्हणजे त्यांचे निसर्गप्रेम हे नुसतेच संन्याशाने आसमंतावर केलेले प्रेम नाही. रामदासांचे प्रेम हे त्यापलीकडे जाऊन निसर्गावरील प्रेमाची व्यावहारिक उपयुक्तता दाखवून देते. अलीकडच्या काळात फॅशन झालेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, पर्यावरणरक्षण वगैरे काहीही परिभाषा ज्या काळात जन्मालाही आलेली नव्हती त्या काळात उत्तम भौतिक जगण्यासाठी उत्तम, निरोगी निसर्ग कसा आवश्यक आहे, हे ते सांगतात. म्हणूनच त्यांच्यासाठी केवळ शिवाजीमहाराज छत्रपती झाले, त्यांचा राज्याभिषेक झाला, हेच कारण आनंदवनभुवनासाठी पुरेसे ठरत नाही. ‘उदंड जाहले पाणी..’ ही अवस्था जेव्हा येते तेव्हा आपल्या स्वप्नातील आनंदवन साकार झाल्याचा आनंद रामदासांना मिळतो, हे नदीवरचे, पाण्यावरचे प्रेम रामदासांच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येते.. 
‘वळणें वांकाणें भोवरे। उकळ्या तरंग झरे। लादा लाटा कातरे। ठाईं ठाईं।। शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ । चिपळ्या चळक्या भळाळ। चपळ पाणी।। फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे। थेंब फुई मोजावे। अणुरेणु किती।।’ 
काय बहारदार शब्दकळा आहे पाहा! नदी वाहते कशी? ते उदक धावते कसे? याचे इतके उत्तम वर्णन करण्यासाठी निसर्गावर प्रेम तर हवेच; आणि त्याच्या जोडीला त्या प्रेमास तोलून धरणारी प्रतिभाही हवी. या पाण्यावर त्यांचे प्रेम आहे. या वाहत्या पाण्यासारखे दुसरे काहीही निरागस, सुंदर नाही असे त्यांना वाटते. रामदास लिहितात- ‘त्या जळाऐसें नाही निर्मळ। त्या जळाऐसें नाहीं चंचळ। आपोनारायेण केवळ। बोलिजे त्यासी।’ ही पाण्यातली सुंदरता विलोभनीय खरीच; पण त्याच्या जोडीला पाण्याचा कोणातही सहज मिसळून जाण्याचा गुणधर्मही महत्त्वाचा. त्याचे वर्णन करताना रामदास समस्त मानवजातीला नकळत सल्लाही देऊन जातात.. ‘येक्यासंगे तें कडवट। येक्यासंगें तें गुळचट। येक्यासंगे ते तिखट। तुरट क्षार।। ज्या ज्या पदार्थास मिळे। तेथें तद्रूपचि मिसळे। सखोल भूमीस तुंबळे। सखोलपणें।। विषामधें विषचि होतें। अमृतामधें मिळोन जाते। सुगंधीं सुगंध तें। दरुगधीं दरुगध।। गुणीं अवगुणीं मिळे। ज्याचें त्यापरी निवळे। त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेंविण।।’ यातला लक्षात घ्यावा असा भाग म्हणजे रामदासांना निसर्गत: वाहते पाणी- म्हणजे नदी ही मायेसमान भासते. वाहत्या पाण्याचे रूप जसे कोणास कळत नाही, तसेच मायेचेही आहे. मायादेखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. हा झाला एक विचार! पण या अशा विचाराशिवायदेखील रामदास नदीचे कोडकौतुक संधी मिळेल तेथे मोठय़ा प्रेमाने करतात. या नदीवर, वाहत्या पाण्यावर त्यांचे इतके प्रेम, की ‘दासबोध’ लिहिण्यासाठी त्यांनी जागा निवडली तीदेखील वाहत्या पाण्याचे सतत दर्शन देणारी. ‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।।’ हे त्यांचे वर्णन त्या शिवथर घळीचेच. तेव्हा त्यांना वाहते पाणी नेहमी खुणावत राहिले असे मानण्यास निश्चितच जागा आहे. या वाहत्या पाण्याभोवती उत्तम शेती फुलली, देवधर्म झाला आणि विविध संस्कृती उदयाला आल्या, याचे भान त्यांना असल्याचे दिसून येते. पाण्याची उपयुक्तता हा एक भाग. ती पाहताना रामदासांनी त्यामागील सौंदर्यगुणांकडे दुर्लक्ष केले असे झाले नाही. ‘नाना नद्या नाना देसीं। वाहात मिळाल्या सागरासी। लाहानथोर पुण्यरासी। अगाध महिमे। नद्या पर्वतींहून कोंसळल्या। नाना सांकडिमधें रिचवल्या। धबाबां खळाळां चालिल्या। असंभाव्य।’ नदीचे वर्णन करताना ते असे हरखून जातात. ही वाहती नदी त्यांना केवळ पाहायलाच आवडते असे नाही. ती त्यांना सर्वागसुंदर भासते. त्या पाण्याचा खळखळ आवाज, त्या वाहण्यातून आसपास तयार होणारी आद्र्रता अशा सगळ्याचेच आकर्षण रामदासांच्या वाङ्मयातून ध्वनित होते. ‘भूमंडळीं धांवे नीर। नाना ध्वनी त्या सुंदर। धबाबां धबाबां थोर। रिचवती धारा।। ठाईं ठाईं डोहो तुंबती। विशाळ तळीं डबाबिती। चबाबिती थबाबिती। कालवे पाट।।’ वाहते पाणी सुंदर असते, सुंदर भासते म्हणून ते केवळ वाहतच राहावे आणि समुद्राला जाऊन मिळावे असे त्यांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे, हे पाणी पृथ्वीच्या गर्भापर्यंत जायला हवे. ‘वॉटर टेबल’ हा शब्दप्रयोग त्याकाळी जन्मास यावयाचा होता आणि कोणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अशी मोहीमही हाती घेतली नव्हती. पण तरीही रामदासांना पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्व माहीत होते. पाणी जमिनीत मुरले तरच ते साठून राहू शकते, असे रामदास सांगतात. ‘पृथ्वीतळीं पाणी भरलें। पृथ्वीमधें पाणी खेळे। पृथ्वीवरी प्रगटलें। उदंड पाणी।।’ पृथ्वीच्या पोटात हे असे पाणी भरले की मगच ते लागेल तेव्हा वाहू शकते. त्याचे कालवे, पाट काढता येऊ शकतात. हे सर्व रामदासांना सांगावयाचे आहे. वरवर पाहता हा संदेश तसाच दिला गेला असता तर कोरडा ठरला असता. परंतु रामदास किती काव्यात्मतेने तो देतात, ते पाहा 
‘भूमीगर्भी डोहो भरलें। कोण्ही देखिले ना ऐकिले। ठाईं ठाईं झोवीरे जाले। विदुल्यतांचे।। ऐसें उदक विस्तारलें। मुळापासून सेवटा आलें। मधेहि ठाईं ठाईं उमटलें। ठाईं ठाईं गुप्त।।’ झोवीरे म्हणजे झरे.
खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांना रामदास आकाशातल्या विजेची उपमा देतात. पाण्याला आपण ‘जीवन’ म्हणतोच. रामदास पुढे जाऊन सांगतात- झाडेझुडपे, वृक्षवेली आदींना जे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत, तेदेखील पाण्यामुळे. ‘नाना वल्लीमधें जीवन। नाना फळीं फुलीं जीवन। नाना कंदीं मुळीं जीवन। गुणकारकें।। नाना यक्षुदंडाचे रस। नाना फळांचे नाना रस। नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र।।’ तात्पर्य ‘उसात गोडवा निर्माण झाला आहे तोदेखील पाण्यामुळे!’ हे रामदास नमूद करून जातात.महाराष्ट्राने या गोडव्याच्या लोभाने पाण्याचा किती भ्रष्टाचार केला, हे तर विदित आहेच. महाराष्ट्रात जी दुष्काळी स्थिती आहे तीदेखील या जलव्यवस्थापनाच्या अभावानेच. जवळपास ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास हा नि:संग कवी पाण्याचे महत्त्व सांगतो; आणि आजच्या सुशिक्षित महाराष्ट्राला ते जाणवू नये, हीच या राज्याची शोकांतिका नव्हे काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रामदासांचा हा श्लोक- ‘उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायक। पाहातां उदकाचा विवेक। अलोलीक आहे।।’ हा उदकाचा विवेक महाराष्ट्रात पुन्हा दिसणार काय? -
मातृदिन ----------आमच्यावेळच्या आया प्रेमळ असतीलहि पण त्या पेक्षा कर्तव्य कठोर जास्त होत्या अस वाटतंय ,उगीच बाबा ,पुता ,सोनू ,मोनू हा प्रकार नाही .जेवणात ,खाण्यापिण्यात सुद्धा माफक लाड नाहीतर "खायचं तर खा नाहीतर रहा उपाशी "किवा "रडलास तरी चालेल ,काहीही मूत आटत नाहीये "हे बोधामृत ठरलेल .
एकदिवस आईने बाहेरून येऊन फतवा काढला "निवास उद्यापासून सकाळी ७ वाजता बालक मंदिर ".मी माणिक [बालमंदिरातील बाई] जवळ आत्ताच बोलल्ये.आमच्या वेळी बालकमंदिर होती प्ले ग्रुप नव्हते ,मंदिराचा खेळ खंडोबा झाला नव्हता.माझी हे ऐकल्यावर मुसमुसायला सुरवात ,आई ने लक्षच दिले नाही ,ती माझ्यासाठी आणलेली दगडी पाटी कोळशाने घासून लक्ख करीत होती .ते झाल्यावर तिने माझी मुलाखत घेतली ,तुझ नाव सांग मग मी रडत "श्रीनिवास उ उ केशव चितळे ,मुक्काम उ उ पोस्ट चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी ,देश भारत ,खंड आशिया .रडायला काय झाल ? मला नाही जायचं बालक मंदिरात . या दप्तरात हि पाटी भर ,दगडी पेन्सिलला टोक काढ ,पेन्सिल खायची नाही ,तोंडात घालायची नाही ,आणि हो पाटीला पुसायला जर थुंकी लावलीस तर सरस्वतीदेवी रागावते ,काहीही विद्या येणार नाही .हळूहळू मी भोकांड पसरायच्या मूड मध्ये .तेवढ्यात काकू आली आणि तिने मला पदरात घेतले "शामल[माझी आई] काय तुझ चाललय बालक मंदिर ,बालक मंदिर ,मी सांगत्ये निवास अजिबात उद्या जायचं नाही ,परवा पासून जायचं ",म्हणजे हि देखील तिला सामील .मग दोघींनी मिळून थोडावेळ माझी समजूत काढली अरे बाबा शाळेत जाऊन विद्या शिकला नाहीस तर मोठा कसा होशील ? तुला मोठा साहेब व्हायचं आहे ना ?माझ रड थांबेना मग मोठी आई [काकू ]मला स्वयंपाक घरात घेऊन गेली हातावर गुळाचा खडा ,"आधी रड थांबव ,हा खा आणि जा अमळ देवळाशी खेळायला .थोडावेळ संकट टळल या आनंदात मी पळालो ,उशीर झाला तरी देवळात बसलेला ,आई आली आणि म्हणाली घरी चल ,मी म्हणालो मला नाही यायचं तू उद्या बालक मंदिरात पाठवशील .आई मारुत्या गुरवाला म्हणाली मारुत्या त्याला फरफटवीत थोड्या वेळाने घरी आण नाही ऐकला तर गठडी वळून घेऊन ये .आल्यावर सरबत्ती सुरु अरे शाळेत जाणार नाहीस मग शेणगोठा करून गुर का चरायला नेणार आहेस तस तरी सांग म्हणजे हरी उदेकाला उद्या पासून येऊ नको सांगत्ये ,तरीही माझ रडण सुरु ,मग जवळ घेऊन पदराने माझ तोंड पुसून म्हणाली अस करू नये बाळा,शाळेत जायलाच हव ,शिकायला हव ,मोठ व्हायला हव ,१० /१५ मिनिटे समजवण्यात गेली तरी माझ रड थांबेना मग चौदाव रत्न ,केरसुणीचा एक हिर काढून सपासप माझ्या पोटरीवर प्रहार चालू झाले "म्हणे शाळेत जाणार नाही ,दळभद्री लक्षण ,उद्या पासून जेवण बंद ............" या सगळ्या प्रकारात घरातील वडिलधार कोणीही मध्ये पडल नाही .
रात्री झोपलो तेव्हा पायावरून हात फिरत होता ,आई कसल तरी मलम पायाला लावीत होती आणि रडत होती .
दुसऱ्या दिवशी सकाळी मी निमूट बालकमंदिराच्या रस्त्याला लागलो आणि सात वाजता प्रार्थना सुरु झाली "बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा ".
बन्याबापू --लक्ष्मीनारायणाच्या देवळात रामनवमीच्या उत्सवाचे लळीताचे ‘एकच प्याला’ नाटक, आर्य मदिरा मंडळाचा प्रवेश सुरु होता. एवढ्यात प्रेक्षकांमध्ये कुजबूज, “काय झालं? “काय झालं? सगळीकडे गलका ! त्या प्रवेशात रंगलेल्या बन्याकाकांच्या घरी भाताच्या उडविला आग लागली होती. त्या काळी कोकणात एखाद्याच्या घरी भाताच्या उडविला आग लागणे म्हणचे केवढे संकट होते हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. पण घरात १०/१२ खाणारी तोंड ,वडिलोपार्जित फक्त बुद्धीची इस्टेट लाभलेल्या ,सरस्वतीचे वरदान असूनही लक्ष्मीने सावत्रपणाची वागणूक दिलेल्या, फक्त नमस्काराचे धनी असलेल्या भिक्शुकाला हा मोठाच तडाखा होता. एखादा कोलमडून पडला असता, पण इथेच आमच्या दादाचं वेगळेपण होत. नाटक व्यवस्थित पार पडलं. इतरांच्या छातीचे ठोके वाढले पण दादांच्या नाडीचे ठोके अजिबात वाढले नाहीत.
आमचे दादा हे खरोखरच एक वेगळंच रसायन होत. ३० इंची निधडी छाती ! आयुष्यभर अनेक घरगुती,सामाजिक ओझी वाहणऱ्या देहाने वजनकाट्यावर ४० किलोचा आकडा कधीही ओलांडला नाही. प्रसादाच्या मुदीएवढया तपकीरीत डोक्याला टिळ! लावतात तेवढा बुक्का मिसळल्यावर जसा रंग तयार होईल तसा वर्ण ,प्रचंड ताकद असलेले भेदक डोळे ,देशस्थी वर्णात मेंदू मात्र कोकणस्थी आणी सर्वात मुख्य आणी धारदार अस्त्र म्हणजे जीभ
ते आमचे दादा ,जवळच्या नातेवाईकांचे आणी ओळखीच्या मंडळींचे बन्याकाका आणी पंचक्रोशीत इतरांचे बन्याभाव होते .त्यांचे पाळण्यातील व कागदोपत्री नाव गोविंद काशिनाथ होते हे त्याचं त्यांना आठवत होत कि नाही देव जाणे .
वास्तविक माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे त्यांच्या चाळीशीत त्यांचा एक लाख विडी ओढण्याचा संकल्प पुरा झाला असावा ,त्यांनी आयुष्यात श्वास कमी घेतला असेल विडीचे झुरके जास्त ,भोसले छाप विडी ,त्यात पहिला झुरका विडीची जळती बाजू तोंडात धरून मारलेला ,या अग्निहोत्रात कधीही खंड पडला नाही .निद्रानाशा मुळे रात्रीही हे विडीच अग्निकुंड अखंड धगधगत असायचं .एवढे असूनही मी त्यांना कधीही खोकताना पहिले नाही ,छातीत कफ नाही .चर्चिल ने ओढलेल्या चीरुट ची थोटक व दादानी ओढलेल्या विडयाची थोटक यांची माळ केली असती तर इथून ती सहज इंग्लंड पर्यंत गेली असती . पाहिलं व्यसन विडी आणी दुसर चहा ,तो लागायचा किती तर त्यांच्या भाषेत म्हणजे एक तोळा.त्यांना अनेक वर्ष अल्सरचा त्रास होता त्यामुळे जेवणही कमी ..एव्ह्ढ सार असूनही त्यांच्याकडे एनर्जीचा कुठला झरा होता भगवान जाणे .रात्रभर निद्रानाशामुळे जागे असूनही सकाळी टवटवीत १८/१८ तस काम करायचे ,कोणी विचारले ‘बन्या काका ,तब्येत कशी आहे “?कि म्हणायचे “कुंडलीत अन्नद्वेष ,निद्रानाश आणी कामातीरेक योग आहे .”
दशग्रंथी बापाचा हा मुलगा .पण याचे दशग्रंथ वेगळेच होते .याज्ञिकी,काव्य ,चित्रकला, गायन,वक्तृत्व,व्यापार ,समाजकार्य ,अभिनय या अष्टग्रंथांना थोडासा अहंपणा व सडेतोडपणा या दोन ग्रंथांचाही टीळा लागला होता .तरुणपणी मुंबईमध्ये भिक्षुकीला आलेल्या या पठ्याने एका इंग्लंड मध्ये स्थायिक होऊन मडमेशी लग्न केलेल्या दादर येथील यजमानाकडे तीला  कळावी म्हणून कथा ओर्गंनचा सूर लावून संस्कृत आणी इंग्लिश मधून म्हणजे “वन शौनक नेम्ड रिशी
वॉज स्टेइंग इन ए जंगल नेम्ड नैमिष”अशी सांगितली होती  .पुढे त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार चिपळूणला गेले आणी मग आयुष्याच समर सुरु झालं .वयाच्या तिशीत आई ,वडीलांच छत्र हरपलं आणी मग मोठ्या कुटुंबाची जबाबदारी या हडकुळ्या खांद्यावर येऊन पडली .नाना प्रकारचे उद्योग झाले टुरिंग टोकीज ,भाजीचा व्यवसाय,दुग्ध व्यवसाय,बरेचसे आतबट्याचे ठरले ,शेवटी १९५०/५१ मध्ये आपल्या वृत्तीला साजेस लग्न –मुंजीच कार्यालय सुरु केली.त्यातही व्यवसायापेक्षा गरिबांची सोय हाच प्रमुख हेतू होता.’मंगल कार्यालय ,नव्या बहिरीचे देवळाजवळ “हि पाटी आज ६० वर्षांनीही ,आधाराला दोन मजली आर .सी .सी .कन्स्ट्रक्शनची दणदणीत इमारत घेऊन उभी आहे .त्यांचा मुलगा हा वसा उत्तम रित्या पुढे चालवतोय.
भिक्षुकी या धंद्याला जी एक मिंधेपणाची ,लुब्रेपणाची काळी झाक होती टी दादांकडे कधीही दिसली नाही.मंत्र जेव्हढे आवश्यक तेवढे येत होते पण तंत्र आणी प्रदर्शन अफाट होत.वास्तुशांत म्हणा,नवचंडी ,शतचंडी म्हणा ते यज्ञकुंड व इतर पुजासाहीत्याची जी मांडामांड करायचे ती बघून यजमान व आवाहित देवता खुश होऊन जायच्या.
मला आठवतंय आमच्या गावातील एक मुलगी लग्नात सप्तपदीचा अर्थ सांगायला बन्याकाकाच हवेत असा हट्ट धरून बसली होती.”एकपदी भव मामानुव्रतावः”,आणी मग रसवंती सुरु व्हायची.दुर्दैवाने त्या काळी रेकोर्ड करायची साधन गावात उपलब्ध नव्हती .
लोकसंग्रह अफाट होता,धर्म,जात ,दर्जा,आर्थिक परिस्थिती कसलाही कुंपण नव्हत.
बन्याभाव पाडशी इकलीव?असे विचारात खानदाटपालीचे गोपाळराव महाडिक यायचे ,मध विकायला आलेले भोरपी असायचे शिरुकाका ,रामभाऊ बापटासारखी डॉक्टर ,शिक्षक मंडळी,बाबुशेठ मारवाडी,ब्रीज खेळण्यासाठी कलेक्टर, त्यांच्या त्याकाळात असलेल्या स्लीवलेस म्याडम,कधी नाट्यमंदार वाले राजाराम शिंदे ,कधी काशिनाथ घाणेकर असायचे मग जो गप्पांचा फड रंगायचा तो नुसता ऐकत राहण्यासारखा असायचा. ज्यांना बहिणी नाहीत अथवा दूर गेलेल्या आहेत अशा शे शंभर माणसांची बासुंदी-पुरीची पंगत भाऊबीजेला आमच्या अंगणात असायची.
त्या काळात कोकणातील त्या वयाचे बरेचसे गणपती सर्वसाधारण याच छापाचे होते. फरक फक्त एवढ!च की बरेचसे उजव्या सोंडचे व काही डाव्या सोंडचे.पण काही ठराविक गोष्टी सोडल्या तर दादा डाव्या सोंडचे ठरले असते. आजी,आजोबांची होणारी वार्षिक श्राध्दपक्ष, कुळपरंपरेने चालत आलेली वामनद्वादशी पूजा,(त्या दिवशी व्दादशी श्रवणनक्षत्रयुक्त असलीच पाहीजे हा कटाक्ष)  गणपतीत होणारा मंत्रजागर, नवरात्रीचे उपवास, टिळक पंचांगाचा वापर या काही ठराविक गोष्टी वगळता आमचं घर म्हंणजे एक धर्मशाळा होती आव-जाव घर तुम्हारा.
दादांची दरवर्षी न चुकता दोन वेळा पत्र यायची. आजी आणि आजोबांची श्राद्ध!ची तारीख कळवण्यासाठी व त्यात लिहिलेले असायचं, दुपारी बरोबर १२.०० वाजता आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करावा.’पिंडान नमस् कुर्यात’ची वेळ बरोबर १२.०० वाजता येईल.
खाली टाटा फिनलेच धोतर,वर सदरा, त्यावर निळा कोट, वर मानेला गुंडाळलेलं उपरण, कपाळावर कुंकवाची चिरी, डोक्यात काळी पण डोक्यावर गांधी टोपी, पायात मिळतील त्या वहाण! (चपलेच्या आकारची अट नव्हती) हा वेष, भिक्षुकीला जातांना सदरा,कोट,टोपी, यांना रजा असायची.चातुर्मासात देवळात कीर्तन करायला जायचे तेव्हा पगडी, कानात कायम कनोजी अत्तराचा बोळा आणि हे अत्तर चिमटीवर चोळून वास घ्यायची सवय. अंगठी हा अत्यत आवडता दागिना, त्यांच्याकडे पाहून अंगठी बोटात घालतात आणि जानव्याला ब्राह्गाठीसारखी बांधतात अशी माझी अनेक वर्ष समजूत होती. कोणी काही झकास काम केलं किंवा कोणी उत्तम विनोद केला की ‘पोऱ्या, अप्रतिम !’ असं कौतुक व ‘तुला एक चहा’ हे बक्षीस असायचं आणि हे काम वरच्या पातळीच असंल तर बोटातील अंगठी सगळ्याच्या देखात काढून देण ही सवय होती.घरात कोलंब्या तांदुळाचा भात घरच साजूक तूप व चहाला निरस दुध यात तडजोड चालत नसे ,आम्ही मुंबईकर किवा पुणेकर खातो ते कदान्न ही त्यांची समजूत आम्ही शेवट पर्यंत बदलू शकलो नाही .अनेक विद्यार्थी त्या काळी आमच्याकडे शिकून गेले,एक मोहिते नावाचा आंबेडकरी मुलगाही राहायला होता ,पण सगळे जेवायला एकच पंक्तीत.स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकडे फारस लक्ष नव्हत.कुठ्ल मुल कितव्या यत्तेत आहे याचाही पत्ता नसायचा.काही काम असल की आशे,वाशे,कुम्ये ,सुम्ये ,उषा ,मिन्ये ,कल्पन अशी बा अदब बा मुलाहिजा सारखी आरोळी ठोकायचे व जी हजार असेल तिने ओ दयायची हा दंडक होता.
नाटयदिग्दर्शन व अभिनय हे एक वेड  होते.उत्तम विनोदी भूमिका करीत ,साष्टांग नमस्कार नाटकात त्यांच्या सुटा-बुटातील एन्ट्रीलाच कडकडून टाळी मिळाली होती .आयत्या वेळी एकच प्यालातील रामलाल व देवमाणूस मधील दादाची भूमिका त्यांनी उत्तम केली होती .अट फक्त एकच प्रोम्पटिंगवाला उत्तम हवा.त्यांनी विद्याहरण नाटकात देवयानीही केली होती.
हिंदू महासभेने निजामाच्या हैद्राबादमधील अत्याचारा  विरुद्ध भागानगर येथे सत्याग्रह केला होता त्यात भाग घेऊन तुरुंगवासाची हवाही खाउन झाली होती ,तुरुंगात यांचे वजन दोन किलो वाढल्याचीही वदंता होती.
उत्तम शीघ्र कवी होते,एका लग्नात वरपक्षाकडील खूप मंडळी पाहून पटकन म्हणाले “हे वऱ्हाड नोहे ,मुलीच्या बापाचे वर हाड आले “.चित्रकलेच उत्तम अंग होत.सत्यनारायणाची कथा व सहस्रनाम पाठ असल्या मुळे तोंडाने विश्वस्मैनमः,विष्णवेनमः,वषटकरायनमः चालू असायचं आणि समोरच्या पाटावर रांगोळीने हत्ती किवा मोर साकारत असायचा.कथा होईपर्यंत हळद ,कुंकू ,बुक्का या उपलब्ध रंगाने तो रंगून एवढा सुंदर तयार व्हायचा की आरतीच्या वेळी हत्ती सोंड हलवायला लागेल अस वाटायचं.
राजकारण ,समाजकारण हे लाडके विषय ,चिपळूणला पूर हे नेहमीचाच ,पाऊस जोरात सुरु झाला की एकेक बुलेटीन निघायची ,पाणी भोगाळयावर आल,चिंचनाका ,वेशीचा मारुती ,लायब्ररी असे हे टप्पे असायचे ,अशा वेळी सर्वाना थोडे उंच जोत असलेल्या घरात पाठविणे ,गुरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात दादा गर्क असायचे.१९६५ साली आलेल्या भूकंपात पाहते भूकंप भूकंप म्हणून ओरडत उठलेल्या गावकरांमध्ये कोयना धरणाचे काय झालं असेल हा विचार करून तिकडे धावणारा पहिला इसम गोविंद काशिनाथ उर्फ बन्याबापू चितळे होता .नगरपालिकेत निवडून गेले पण स्पष्टवक्ते पणामुळे यांची जागा कायम मायनोरीटीत.अफाट वक्तृत्व होत .बोलताना जिभेवर पु.ल.म्हणतात तसा सरस्वतीने मराठीचा क्लास उघडलेला असायचा किवा फाडफाड बोलताना सरस्वती महिषासुरमर्दिनी बनून कथकली करायची .सभा संपल्यावर पूर्ण वंदेमातरम भैरवी रागात एवढ सुंदर म्हणायचे की ते ऐकून मातृभूमी सुजलाम सुफलाम झाल्यासारखी वाटायची .शास्त्रीय संगीत हा आणखी एक आवडता विषय ,कुणाचेही गंडाबंद शिष्य नव्हते,तालीम नव्हती पण रेडिओवर रागदारी लागली की उत्तम गायक असलेल्या विष्णूला विचारायचे “विष्णू कुठला राग ?”मग विष्णू चाचरत म्हणायचा बापू मालकंस वाटतोय .
लग्नाच्या वेळी दांडेकर गुरुजी किवा बाबा जोशी भसाड्या आवाजात कस्तुरी तिलकं ललाटी लावत असताना मांडवात गडबड असायची पण दादाचं “फुलेंदी नवकांतइंदू वदनं “सुरु झालं की पिनड्रोप सायलेन्स.जेवणाच्या पंक्तीत भैरव रागात “तु सागर करुणेचा”म्हणायला लागले की पानातली जिलबी साजूक तुपात तळल्या सारखी वाटायची. हा माणूस चौघडा उत्तम वाजवायचा,विडी मुळे छातीत दाम नव्हता ,नाहीतर सनई सुद्धा वाजवली असती .पाकशास्त्रात कसोटी दर्जा नव्हे पण रणजी ट्रोपिचे खेळाडू नक्की होते ,फक्त तेलाचा वापर स्वतः अरब असल्यासारखे करायचे.
खरी आवड मिठाच्या उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूची,जेवताना उकिडवे व डावा हात दोन्ही पायांना गळ्यात मिठी मारल्यासारखा ठेवून बसायचे .जेवण अत्यंत कमी,आम्ही चेष्टेने म्हणायचो दादा तुम्हाला जेवणापेक्षा चीत्राहुतीलाच भात जास्त लागतो .
त्यांच्या काही आवडी निवडी मात्र अनाकलनीय होत्या ,बाबुराव अर्नाळकर ,मामा वरेरकर ही लेखक मंडळी आवडीची,मुंबईत आले की दादरला फुटपाथवर रहस्यकथाच्या पुस्तकाची शेकड्यात खरेदी व्हायची.दुसरी आवड म्हणजे वल्लभभाई पटेल स्टेडियमवर होणाऱ्या फ्रीस्टाईल कुस्त्या ,दारासिंग ,किंगकोंग,मायटी मंगोल हा टनात वजन असणारी मंडळी अत्यंत प्रिय.बोस्टन क्राब ,इंडियन डेथलोक हे शब्द काही दिवस केशवायनमः,माधवायनमः च्या ऐवजी जिभेवर असायचे.
काहीकाही तर्कशास्त्र ही अजब होती ,लहान मुलाने कुठलीही गोष्ट नही म्हटली की चीढ!यचे,कुणी त्या पोराची तो लहान आहे अशी बाजू घेतली की म्हणायचे ‘तो लहान आहेना !मग नही म्हणायला कुठल्या कॉलेजात शिकला,ज्याला नही म्हणता येत त्याला हो म्हणता आलच पाहिजे. गोळाभर खाणाऱ्याला तोळाभर अक्कल असलीच पाहिजे.’
गुटगुटीत जाडजुड पोरांची आवड.म्हणायचे, ‘बघ पोराच्या शरीराला कुठेही पोचा नाही.’ या त्रिप्ररान्वित अत्रिगोत्री एकारांत्यांच्या शरिरात वैश्यवृत्तीची लस कोणी टोचली होती देव जाणे. पण व्यापाराची अतिशय आवड. खरेदीसुद्धा करायची घाऊक. टोपल्यामधून आंबे,करवंदासारख्या फुटकळ वस्तू विकणार्‍याना, भारे, वरंडी विकणार्‍या माम्याना आमचं घर म्हणजे वस्तू पूर्ण विकत जायज एक खात्रीचं ठिकाण होत.भाषा सुद्धा टपरीचे किती वगैरे नाही. ‘सरळ टोपलीचे किती ते सांग’ हीच.!
दादांनी विकत घेतलेलं एक१०-१२ फुटी चंदनाच्या झाडाचे खोड अनेक वर्ष आमच्या अंगणात पडलं होत. आम्ही त्यावरुन दादांची चेष्टाही करायचो. उदया जर एका हारयात घालून कुणी ८ /१० टेलिव्हिजन विकायला आणले तर आमच्या घरी ह्याची काय किमत विचारून एकदम ८ /१० टेलिव्हिजनची खरेदी झाली असती.
अहंपणा मात्र जबरदस्त होता ,मी म्हणेन तेच व्हायला पाहिजे हा आग्रह होता.घरी काम करायला आलेल्या टेंगळ्या सुताराला देखील ताकीद असायची ‘टेंगळ्या अक्कल माझी आणि फक्त ठोका तुझा.”
रत्नागिरीला आतेकडे गेले होते,कशावरून तरी तिथल्या गड्याला ओरडले ,आते म्हणाली दादा ओरडू नको ,उदया तो काम सोडून जाईल त्यावर पटकन म्हणाले ‘येशे,पिंडाला शिवायला लागतात म्हणून कोणी कावळे बाळगत नाहीत “.माझी आई आजारी होती तेव्हा त्याचं पत्र आल होत ,लिहिली होती काही रोग हत्तीच्या पावलानी येतात आणि मुंगीच्या पावलानी जातात .
लग्न ठरवायला गेले होते,लग्न मुलीच्याच गावी का व्हाव हे सांगताना पटकन म्हणाले ‘त्याच काय आहे अहो मगर पाण्यात असली की हत्तीला सुद्धा ओढते “
मुलांशी तात्विक मतभेद होते,पटायचं नाही ,त्यांच्या साठीशांतीच्या वेळी कोणीतरी चटकन म्हणाले ‘बन्याकाका आयुष्य मजेत चाललय ना ?,मुलगे कर्तबगार आहेत .”एक सेकंदाचा वेळ न काढता म्हणाले ‘खर आहे ,पोर चाटतात पण बैलांच्या जिभेने [बैलाची जीभ खरखरीत असते ].गाईच्या नव्हे.भांडणात एका मुलग्याची जरा वरची पट्टी लागली तेव्हा पटकन म्हणाले”ओरडू नकोस ,नकाशे फडफडले म्हणून कुठे भूकंप होत नाहीत ‘
एका गुरुवारी एक भिकारी दारात आला,दादांनी त्याला पोटभर जेवायला घातली ,तस तो भिकारी म्हणाला “तुम्ही मला दत्तगुरू सारखे भेटलात ‘त्याला बसवली म्हणाले एक फरक आहे ,गुरूच्या पायाशी काय असत ?तो भिकारी म्हणाला कुत्रा असतो.दादा म्हणाले होय ना ?तो कुत्रा माझ्या तोंडाशी असतो .
या माणसाकडे मंत्र टाकून विंचवाच विष उतरवायची कळ ही होती .एकदा शेजारच्या व्यास सरांच्या पत्नीला विंचू चावला,टी दादांकडे आली ,त्यात कोणीतरी चेष्टा केली ,वाहिनी विंचूच चावलांना ?तशी पटकन म्हणाले ‘अरे गधड्या व्यास चावला असता तर परीघ वाढला असता “व्यास वाहिनी हसून हसून दमल्या .
मी दादांना हवालदिल झालेले फक्त एकदाच पहिले ,काकूला शेवटी कर्करोग झाला ,वेदनेने बिचारी ओरडायची,तेव्हा डॉक्टरांना म्हणाले डॉक्टरटिळ वेदनेतून मुक्त करा,टी गेली तरी चालेल .”विना दैन्येन जीवनम,विनायासेन मरणं’एवढ बोलून अक्षरशः धाय मोकलून रडले.
१९८१ साली दादा वारले.वादळ शांत झालं .६७ वर्ष फुललेली ही विडी विझून गेली.योग्य वातावरण ,संधीच कोंदण मिळाल असत तर खरोखर हा अनमोल हिरा होता.
बाहेर पाऊस सुरु झाला,वारा सुसाट सुटला होता ,मी दादांच्या पार्थिवाकडे पहात होतो ,मला उगीचच वाटल दादा उठतील आणि नेहमीप्रमाणे अस वर सुटल की ओरडायचे तसे ओरडतील ‘पोरानो ,आधी माजघरात चला आणि सर्व मंगल मांगल्येचा जप सुरु करा “.
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये मृत्युलेख छापून आला होता ,त्याच शीर्षक होत .....
गोविंद काशिनाथ उर्फ बन्याकाका.
“बन्याबापू ---हा मातीचा गुण की गुणांची माती “    
    


चिरंजीव बालके तात्यास अनेक आशीर्वाद ,पत्रास कारण कि लखू बापटा बरोबर तू पाठवलेला चहापुडीचा खोका आणि नातवाच्या वाढदिवसाचे फोटो मिळाले,मधु फोटोत एवढा बारीक का दिसतोय? येत्या चैत्रात त्याला आठव वरीस लागेल पण अंगाने अजून भरला नाहीये ,या वर्षी त्याची मुंज इथे गावी करावी अस तुझ्या आईच्या मनात आहे ,त्याला परीक्षा झाली कि पाठवून देणे ,दोन महिन्यात गुरगुट्या भात आणि आंबे खायला घालून त्याला खोंडा सारखा तयार करतो .गुरगुट्या मेतकुट भातासारख जगात दुसर टोनिक नाही.तुम्ही देखील ते खाऊनच दगडा सारखे ठणठणीत झालात.
आम्ही सर्व म्हणजे मी आणि तुझी आई क्षेम आम्हाला काय धाड भरल्ये म्हणा ,पण तुझ्या आयशीस मधून मधून खोकल्याची उबळ येते मग रात्रभर विटकराने छाती शेकत बसते .आयशीला जिवंत ठेवायची असेल तर तिला चांगला डॉक्टर वैद्य करणे आवश्यक आहे.त्या मुंबईत राहून ज्या दोनचारशे रुपड्या मिळवता पण त्याचा आम्हास काही उपयोग नाही .आपली शेती ,बाग ,गुर हे सर्व असताना आपणास का भिकेचे डोहाळे लागले आहेत हे तो परमेश्वर जाणे.इतके दिवस चार गडी,बाया बोलवून मी हा गाडा रेटला तसा मी तुमच्यावर अवलंबून नाही पण आता दगदग सहन होत नाही .यावर्षी १५० कलम उत्तम लागले आहे पण खाजणातील कलमांला एकही फळ नाही ,पुढील वर्षी फवारणी करावी लागेल असो आंबे उतरवायला हल्ली गडी मिळत नाहीत .पुढील पडवीचे दहा रेजे बदलायला झाले आहेत तसेच ओटीवरील एक भाल हि पावसाळ्याच्या आधी बदलायला हवे आहे ,टेंगळया सुताराला चार निरोप धाडले आहेत .वरच्या विहिरीचे पाणी आटले आहे .सध्या सगळा व्यवहार खालच्या बागेतील विहिर्रीवर .लक्षा बैल हि खूप थकला आहे ,बागेस व्यवस्थित शिंपण होत नाही.रहाटाची माळहि चार कासरे वाढवून घेतली .परवाच बांधावरच्या ५ माडांचा ३०० नारळ उतरवून चीपळूणास पाठवला .तुळशीच्या अंगणातील कोकम्बीची फळ काढायची आहेत ,तिथला बंधाराही थोडा डाकलग झालाय ,चिरे आले कि लिंपून घेतो.कालच मांडव घालून घेतला.एकदा आंबा उतरवायला सुरवात झाली कि मला उसंत मिळणार नाही.सुपारीची शिंपट गोळा करायची ,सोडे काढायचे ,मांडवावर वाळत टाकणे ,फणस फोडून त्याची साठ घालणे ,आठीळा धुवून चिखलात बुडवून वाळत घालणे ,केरसुणी बांधणे,रोज झापावर आमसूल वाळत घालणे ,खालच्या दोन्ही चोन्ड्यात भाजावण इत्यादी साठी गडी बाया सांगितल्या आहेत .उद्या पासून देवळात रामनवमीचा उत्सव सुरु होईल .
या वर्षी उत्सवाला साष्टांग नमस्कार नाटक करायचं घाटत आहे.अनेक वर्षापूर्वी झाल होत त्यात तुझ्या आयशीने झकास शोभनाची भूमिका केली होती ,झकास दिसायची हो त्या काळी तुझी आई ,पण या इथल्या रामरगाड्यात सापडली त्यात सहा बाळंतपण,एकेकाळी बालगंधर्वाच्या रुख्मिणी सारखी दिसणारी अगदीच कशिया त्यजू पदाला वाली सिंधू झाली .
पुढील आठवड्यात चिपळूण कोर्टात तारीख आहे यावेळी तुझ्या काकाला माझा सोमण वकील आसमान दाखवणार नक्की एकच इच्छा आहे हि भावबंदकी आमच्या पिढी बरोबरच संपावी.परवा माधवचे टपाल आले होते आम्हाला तिकडे या म्हणून लिहिलंय,विमानाच्या तिकिटाचे पैसे पाठवू का विचारीत होता ? त्याला निरोप धाडलाय,कितीही पैसेवाला झालास तरी उताराला पैसे घेण्याएवढा तुझा बाप नादार झालेला नाही .असो .पत्रात शेवटी त्याच्या मुलीने दोन झकास ओळी लिहिल्या आहेत ,अक्षर छान आहे हो पोरीच.बोटावर उभ्या पट्या खाऊन देखील तुझे आणि माधवाचे अक्षर सुधारले नाही पण माझ्या सुंदर अक्षराचा गुण तुमच्या मुलांमध्ये म्हणजे आजोबांचा गुण नातवंडात उतरला.ती लिहिते अज्जूडला नमस्कार आणि ग्रांडपा तुमची खूप आठवण येते ,ते पत्र आल्यापासून तुमची म्हातारी देखील मला ग्रांडपा म्हणते .एकदा जायला हवे हो या चिमण्यांना पाहायला .एकदा ठरव रे ,तू तुझ कुटुंब आणि आम्ही अटकेपार झेंडे लावूया. अरे आता तरी अबोला सोडा,बस झाली भांडण .हो परवा वरच्या आळीतील दादा खरे उलथला खरे ते आपल्या दसक्यातले पण त्यांनीच पिढी तोडली आहे त्यामुळं पत्र मिळाल कि फक्त अंघोळ करावी.
एकदिवस आम्हालाही न्यायला वैकुंठातून विमान येईल,असो.
तुझ कस चालल आहे ,अरे तुझ्या आयशीला रहावेना म्हणून पत्र लिहिले .मुलांच्या परीक्षा झाल्या कि ताबडतोब सूनबाई आणि मुलांना पाठवणे ,येताना २ किलो लाल छत्री चहाचे खोके पाठव .आई रोज मागच्या मांडवावर कावळा ओरडला कि तुझ पत्र येईल म्हणून वेड्यासारखी वाट पहात बसते ,परवा तर दारात भांडहि उपड ठेऊन झाल .
आमचे हे नेहमीचेच आहे ,तब्येतीची काळजी घ्या .जास्त दगदग होत असेल तर साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकून घरी ये इथे आता तालुक्याला उत्तम शाळा आहेत .
सुनबाईच्या आई बाबांना विचारलाय म्हणून सांग.तिच्या भावाला देखील बोलावलंय म्हणून सांग.अरे आम्हालाही आमची पिल्ल मधून मधून बघावीशी वाटतात ,तुम्ही महिनाभर येऊन घराच गोकुळ करून गेलात कि उर्वरित १०/११ महिने भिंती भूता सारख्या अंगावर येत नाहीत .बाळानो तुमच येण हेच आमच्यासाठी वर्षभराच टोनिक असत .
असो .काळजी करू नये .
सर्वाना आशीर्वाद .
तुझा अप्पा .
[मंडळी साधारण ३५/४० वर्षापूर्वी कोकणातून अशी पत्र पुण्या ,मुंबईत येत असत]
मर्म बंधातली ठेव हि --आजोळ 
आज सकाळी देवांची पूजा करीत होतो .एकीकडे तोंडाने हिरण्यवर्णा हरिणीं चालू होत .एवढ्यात बेल वाजली आणि पटकन तोंडून सणसणीत शिवी गेली ,या xxxx ना हीच वेळ बरी सापडते .बायको माझ्याकडे पहात सहज म्हणाली अहो श्रीसूक्त म्हणताय कि शिविमहीम्न स्तोत्र ? मी चमकून पाहिलं ,हाच प्रसंग अगदी असाच साधारण ४५ वर्षापूर्वी माझ्या आजोळी घडला होता .आजोबा पूजा करीत होते ,एकतर आजोळी देवघर म्हणजे लोकसभा होती .शे शंभर मंडळी तरी नक्कीच होती .आजोबा पूजा करायला बसत आणि आजी सहाणेवर गंध उगाळायला.केवढी मोठी सहाण आणि खोड होत .अजूनही सहाण
आहे.हल्ली त्या सहाणे एवढ्या जागेत मुंबईत भय्ये रहात असतील .एकीकडे रुद्र चालू असायचा आणि मधून मधून रामकु शेण नीट ओढून घे .नामोविरुपेभ्योविश्वरूपेभ्यश्चवो नमो ,त्या xxxxx सांग ,काल काळीचा मागचा अचूळ नीट पिळला नव्हतास अरे अशाने गाठी होवून गाय मरेल ना.नमोभवायचंरुद्रायचंनमः पोफळ वरच्या अंगणात पसरा रे .हे अस चालू असायचं आणि मग आजीही तेवढीच खट,हळूच चालू करायची ,"अनंत वाचाळ बरळती बरळ,त्या कैचा दयाळ पावे हरी ".
काय सुरेख जोडी होती हो .आजोबा एक खट तर आजी महाखट पण त्या काळात या जोड्या अशाच होत्या .आज्या पुस्तकी कमी शिकलेल्या होत्या पण जिभेवर कायम नाना फडणवीस .
आजोबांची पूजा झाली कि आजी हळदीकुंकू वाहायला बसायची,अशावेळी आजोबाना चुकून कुणी विचारल कि आजी कुठे आहे म्हणून तर आजोबांचं उत्तर ठरलेल "त्यांच्या देवांशी मुलाखती चालू असतील ,देवांना त्यांची काम वाटून देणे चालू असेल ."आणि खरोखर आजी देवांशी गप्पा मारीत पूजा करीत असायची ."ए लंगडोबा,कधी मोठा होणार आहेस कि कायम आपला बाळकृष्ण ?".गणपती बाप्पा अरे तुला बोलता नाही का येत पुजाऱ्याला ?मुद्दाम आजोबाना ऐकू जाईल असे ..अरे म्हणावे एवढे गंध लावू नका ,सर्दी होईल आम्हाला .ओ लक्षुमबाई केवढा हा मळवट ? पिंजरेच टेंगुळ आलय ग बाई.तू तर काय बाबा नर्मदेतला गोटाच.
मधेच आजोबाना सूचना असायची "बाजारात जाताय तेव्हा येताना चहाची पूड घेऊन या ,संध्याकाळच्या चहाला कुणी बाच्छाव [बादशहा ] पुडीचा नजराणा पाठवणार नाहीये .मध्येच सुनबाईला देवा मार्फत संदेश असायचा .प्रत्येक सून लग्न करून येताना माहेरची देवी घेऊन आलेली असायची ,मग ए आसूदकरणी तुझ्या माहेरवाशिणीला चुलीवर चहाच आधण ठेवा म्हणाव .ए देवरुख्ये [देवरुखच्या मामीची देवी ]तुझ्या साळकाईला सांग ,चुलीकडे लक्ष ठेवा काल वैलावर दुध उतू गेल होत .अस मस्त चाललेलं असायचं .
कधी कधी वाटत साला त्यावेळी रेकोर्डिंग ची सोय असती तर या दोघांचे संवाद टेप करून ठेवले असते .
देव आणि देव्याच नव्हे तर या नामकरणातून झाड झुडप हि सुटायची नाहीत .घराचे भाग सुटायचे नाहीत .
एक पडवी होती तिथे एक अप्पा कासार म्हणून बांगडी विकणारे राहायचे म्हणून ती कासार पडवी होती .एक वैद्य म्हणून विद्यार्थी होते ,घरातील एक माडी कायम वैद्याची माडी झाली ,नानाची विहीर होती ,एका चिऱ्याच्या गाडग्यातून दोन तीन वेळा साप निघाले म्हणून तो चावरा गडगा झाला .
देवाला आज फुल आणली नाहीत का ?अरे ,कुणीतरी त्या सत्यभामेला जरा हलवा रे .नवीन मंडळी बघतच रहायची पण घरातील मंडळी शांत ,एकजण उठायचा आणि परडी भरून १० मिनिटात पारिजातकाची फुल घेऊन यायचा .हि आमच्या आजीने केलेली झाडांची बारशी.काही नाव वंशपरंपरेतून आली होती काही आजीने ठेवलेली आणि या प्रत्येक नामकरणापाठी काहीतरी इतिहास होता .
तशी झाड सगळ्यांनाच आवडतात पण त्याना ही काही खोडकर ,कौतुकाची नाव ठेवण्याची सवय फार थोडे ठिकाणी .पुण्यात जसे मारुती आहेत आणि त्यांना विचित्र नाव हि आहेत तशी कोकणात कुत्रा ,बैल ,गाईच नव्हेत तर झाडानाही गोड नाव दिलेली असतात ,तशी सगळीकडेच हि पद्धत आहे पण एक बारीक फळ देणाऱ्या आंब्याला रोंग्या हि कोकणी खासियत .
आज हुप्याचे फणस उतरवायचे आहेत हे म्हटले कि बाळ्याला नेमके कळायचे कि आज आपल्या बागेतील एकदम शेवटच्या फणस उतरवायचा आहे .बागेच्या चार कोपर्यात चार पिंपळ होते त्यांना कुबेर ,अनल ,यम आणि अगस्ती [समुद्राच्या बाजूला होता ]अशीच नावे होती .
सदफुलीला आनंदी नाव होत .अनंताच्या झाडाला आजोबा कृष्णा म्हणायचे ,एकतर अनंत म्हणजे कृष्ण आणि आजोबांचे एक कृष्णाचे काम करणारे कृष्णा गोरे म्हणून आवडते नट होते ,आम्ही अनंताची फुल कधीच काढली नाहीत ,कृष्णाला खुडला .
एक पपनशीच झाड आहे ,अजूनही आमच्याही तोंडी "बयोला केवढी फळ आली आहेत ".असच येत ,कुणीतरी एक बयो जरा स्थूल होती झाल ती पपनस बयो झाली .एका आंब्यावर नेहमी कोकीळ ओरडायचा तो नारायणराव झाला होता हे ठीक पण एक कोकंबी इरावती का होती देव जाणे.
रोंग्या ,थोट्या ,मोहंबा ,साखरबीटकी होती हे ठीक पण एक वेडxx आंबा का आहे हे विचारल्यावर अरे फळ येत तेव्हा भरमसाठ नाहीतर फक्त तोरणाला पानासाठी उपयोग हे उत्तर मिळाल .
पोट्या,झुक्या ,हुप्या हि फणसाला नाव .काळ्या तुळशीला काळूबाई आणि इतर तुळशीला नावडती हे आजीने केलेलं नामकरण .
सर्व पत्री १५ ते २० मिनिटात काढून आणण्यासारखी होती पण आजोबा कधी पत्री गोळा करा म्हणाले नाहीत ,त्याला आजीबाईचा बटवा गोळा करा रे म्हणायचे .
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे आणखीन वेगळ काय होत ?